मुंबई – सध्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने फेरीवाल्यांच्या बाजूने मोर्चा काढला होता. आता मुंबई उपनगरातील चेंबूर विभागात आरपीआय आठवले गटाने देखील फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात आरपीआय, हिंद मजदुर सभेचे कार्यकर्ते आणि फेरीवाले सहभागी झाले होते.
चेंबूर नाका ते चेंबूर रेल्वे स्थानक असा हा मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांनी चेंबूर पोलीस ठाण्यात पत्र देऊन फेरीवाल्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी वारंवार आंदोलने होत आहेत. परंतु फेरीवाल्यांना हा नाहक त्रास दिला जात असून फेरीवाल्यांना पुन्हा असा त्रास दिल्यास त्याचे ‘आरपीआय स्टाईल’ने उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया चेंबूर आरपीआय पदाधिकारी रवी गायकवाड यांनी दिली.