मुंबई : कोरोनाचा कहर वाढून जात असताना करोनाचे काही संशयित रुग्ण विलगीकरण कक्षातून पळून जात आहे. अशा घटना काही समोर येत आल्या आहे. त्याविरुध्द राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. विलगीकरण कक्षातून पळून जाणाऱ्यांविरोधात कारवाई करा, असे आदेशच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. विलगीकरण केंद्रातून संशयित रुग्ण पळून जाण्याचे वृत्त वारंवार येत आहे. हे त्यांच्याच नव्हे तर, इतर नागरिकांच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. त्यामुळे साथीचे रोग नियंत्रण अधिनियमान्वये अशा रुग्णांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस दलाला देण्यात येत असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षातून पळून जाणाऱ्या रुग्णांवर आता थेट पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
वारंवार कोरोना विलगीकरण केंद्रातून रूग्ण पळून जाण्याचे वृत्त येत आहेत. हे त्यांच्याच नव्हे तर इतर नागरिकांच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. पोलीस दलाला
‘साथीचे रोग अधिनियमान्वये’ अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालय देत आहे.#WarOnCorona— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 19, 2020
तीन दिवसांपूर्वी अहमदनगरमधून करोनाचे तीन संशयित रुग्ण पळाले होते. तर नागपूरच्या मेयो रुग्णालयातून चार रुग्ण पळून गेले होते. या चारही जणांवर साथ रोग प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवडमधील करोना संशयित एका रुग्णाने पलायन केले होते. पोलिसांनी बराच शोध घेतल्यानंतर तो मित्राच्या घरी भोसरी येथे सापडला.