मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येकाने काळजी घेण्याची तसेच गर्दीची ठिकाणे टाळण्याची गरज आहे. गर्दी कमी झाली नाही तर मुंबईत लॉकडाऊन पुढील दहा दिवस महत्वाचे आहेत. ३१ तारखेपर्यंत हे १० दिवस आपल्याला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
सध्या राज्यात करोना साथीचा दुसरा टप्पा आहे. आपण तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठीच आम्ही सातत्याने आवाहन करत आहोत, असे नमूद करत कृपा करून गर्दी टाळा, अशी कळकळीची विनंतीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज गुरुवार (१९ मार्च) केली. राज्यात गेल्या १२ तासांत करोनाचे ४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. ४९ पैकी मुंबईमधील एका व्यक्तीचा १७ मार्चला मृत्यू झालेला आहे. करोना बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतील दोन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.