मुंबई : शिवसेना भाजपामध्ये पेच कायम असून, शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होणार या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक गुरुवारी सकाळी 11 वाजता मातोश्रीवर आयोजित करण्यात आली आहे.
सत्तासंघर्षाला 13 दिवस उलटले असून युतीला कौल मिळाल्यानंतरही सरकार स्थापन झाल नाही. महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपणार आहे. तोपर्यंत नवे सरकार अस्तित्वात येऊन हंगामी अधिवेशन होण्याची गरज आहे. अन्यथा राष्ट्रपती राजवटीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शिवसेनेने डावपेच आखायला सुरुवात केली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास बळावला आहे.
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना उल्लेख करत आहेत. त्यामुळे मातोश्रीवर गुरुवारी होणा-या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.