मुंबई : युवा सेना प्रमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’ च्या संकल्पनेवर २६ जानेवारीपासून मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर २४ तास खुले राहणार आहेत.
मुंबईत ‘नाईट लाईफ’ असावं ही संकल्पना भाजप शिवसेना युती सरकारच्या वेळी सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. त्यावेळी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रायोगिक तत्वावर यावर निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे आदित्य ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने हे पहिले पाऊल पडलं आहे. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरु राहू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते २४ तास व्यवसाय करु शकतात.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला, शहराला विशिष्ट असा इतिहास आणि संस्कृती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ‘नाईट लाईफ’ सुरु करता येणार नाही. मुंबईतील काही भागांमध्येच नाईट लाईफ सुरु करण्यात येत असून ते फक्त प्रायोगिक तत्वावर असणार आहे. सुरुवातीला हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॉल यांना २४ तासांचा परवाना मिळणार आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.