नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शाह व भाजपचे इतर नेते आपल्या भाषणांमध्ये ‘तुकडे तुकडे गँग’ ह्या शब्दाचा उल्लेख करतात. त्यामुळे एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल माहिती मागितली होती. परंतु आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे गृहमंत्रीसह भाजपचे नेते तोंडघशी पडले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे ‘तुकडे तुकडे’ गँग बद्दल माहिती मागितली होती. विशेष म्हणजे भाजपाच्या नेत्यांकडून अनेकदा भाषणामध्ये ‘तुकडे तुकडे गँग’चा देशात विभाजन घडवण्याचा डाव आहे अशी टीका केली जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये २०१६ साली झालेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर भाजपाच्या नेत्यांकडून ‘तुकडे तुकडे गँग’ हा उल्लेख वरचे वर होऊ लागला. याचसंदर्भात गोखले यांनी महिती अधिकार हक्काअंतर्गत अर्ज करुन ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल सरकारकडे असणारी माहिती उघड करावी अशी मागणी केली होती.
I’m now writing to the Election Commission to take cognizance of this.
Home Minister Amit Shah must explain why he used this term in a rally or he should apologize publicly for lying to the people & misleading them.
— Saket Gokhale (@SaketGokhale) January 20, 2020
तुकडे तुकडे गँग केवळ अमित शाह यांच्या संकल्पनेत…
याच अर्जाला आलेल्या उत्तराचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत गोखले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मी केलेल्या आरटीआय अर्जाला उत्तर दिले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे तुकडे गँगबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही असं या उत्तरामध्ये म्हटलं आहे. म्हणजेच तुकडे तुकडे गँग अस्तित्वात नाही. ती केवळ अमित शाह यांच्या संकल्पनेत आहे,” असे ट्विट गोखले यांनी केलं आहे.
शाहांनी माफी मागायला हवी…
अमित शाह हे राजकीय भाषणांमध्ये ‘तुकडे तुकडे गँग’चा उल्लेख करतात यासंदर्भात निवडणुक आयोगाने दखल घ्यावी यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे गोखले सांगतात. “सभा आणि भाषणांमध्ये केंद्रीय गृहमंत्री हे शब्द का वापरतात हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे किंवा लोकांसमोर खोटं बोलल्याबद्दल आणि त्यांची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागायला हवी,” असं गोखलेंनी म्हटलं आहे.
२६ डिसेंबर रोजी दिल्लीमधील एका प्रचारसभेमध्ये अमित शाह यांनी “सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध देशभरात होणाऱ्या आंदोलनासाठी काँग्रेस आणि ‘तुकडे तुकडे गँग’ कारणीभूत आहे,” असं मत व्यक्त केलं होतं. ६ जानेवारी रोजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “मी जेव्हा जेएनयूमध्ये होतो तेव्हा तिथे तुकडे तुकडे गँग नव्हती,” असं मत व्यक्त केलं होतं.