मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
संजय राऊत यांनी दावा केला की, शिवसेनेनं ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. वाटाघाटी व्यापारी करतात, आम्ही नव्हे असा टोला संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. निकाल लागून नऊ दिवस उलटले असून भाजपने आमच्याशी चर्चा का केली नाही. भाजपाकडे 145 चा बहुमत असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावी असेही संजय राऊत यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जी भेट घेतली त्यामागे राजकारण शोधू नका. ते भारताचे मोठे नेते आहेत. त्यांच्याशी भेटण्यात गैर काय असा सवाल संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांची भेट मी अधूनमधून घेत असतो. शरद पवार हे देशाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो त्याचमुळे मी त्यांची भेट घेत असतो. माझ्यावर टीका होते तरीही मी भेट घेत असतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर तसे घडणार असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राज्यात ओला दुष्काळ पडला असून उध्दव ठाकरे हे औरंगाबाद दौ-यावर जाणार आहेत असेही संजय राऊत यांनी सांगितले.