मुंबई : शिवसेना-भाजपात रस्सीखेच सुरु असल्यामुळे शिवसेना भाजपाची साथ सोडण्याच्या तयारी आहेत. शिवसेना काँग्रेस महाआघाडीचा ‘हात’ धरूण सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वहर ओक निवासस्थानी भेट घेतली. आज शुक्रवारी राऊत यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा दावा केला. त्यामुळे शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपा २०१४ प्रमाणेच यावेळीही अल्पमतातील सरकार स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता भाजपाला शिवसेनेची साथ मिळणं जरा कठिण दिसतंय. भाजपाकडे सत्तास्थापन करण्यासाठी 145 चा मॅजिक फिगर नाही. त्यामुळे अल्पमताचं सरकार स्थापन केलं तर त्यांना विधीमंडळात बहुमत सिध्द करावं लागेलं त्यामुळे भाजपाची नऊ दिवसापासून गोची झालेली आहे.
भाजपा बहुमत सिद्ध करू शकले नाही तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली होऊ शकतात. त्यामुळेच विधानसभेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता वाढलीय. शिवसेनेला सत्तेचा समसमान वाटा मिळाला नाही तर शिवसेना भाजपा युतीचा काडीमोड होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस दिल्लीमध्ये शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांना काय आदेश देतात यावर शिवसेनेचीही भूमिका अवलंबून राहिल. यामुळे राज्याच्या घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.