मुंबई: मुंबईत अरबी समुद्रात ओखी वादळाचा धोका घोंघावत असल्या कारणाने सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुंबईसह उपनरगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्रभर सुरु असलेला पाऊस मंगळवारीही कायम असल्याने मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची गैरसोय होत आहे. दादर रेल्वेस्थानक तसेच जेथे सुरक्षित जागा मिळेल तेथे विविध भागातून आलेल्या अनुयायींनी आश्रय घेतला आहे.
शिवाजी पार्कामध्ये चिखल झाल्याने अनुयायांना नाहक त्रास होत आहे. तर मैदानात पालिकेने उभारलेला भव्य मंडपामध्ये पाणी शिरले आहे. तरीदेखील चिखल आणि पावसाची पर्वा न करता आंबेडकरी अनुयायींनी मंडपामध्ये हजेरी लावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६१ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यामुळे राज्यासह परराज्यातील आंबेडकरी अनुयायी १ डिसेंबरपासून मुंबईत दाखल होतात. हे सर्वजण शिवाजी पार्क मैदानावर विसावा घेतात. परंतु, मुंबईत पावसाने सुरुवात केल्याने शिवाजी पार्कात अनुयायांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पालिका जी. उत्तर विभागाने अनुयांयासाठी विविध शाळेत राहण्याची सोय केली आहे. तसेच आंबेडकरी संघटनांनीही आपआपल्यापरीने मुंबईत आलेल्या वयोवृध्द, अपंग आणि महिलांची सोय केली आहे.