नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा महागाईवरुन मोदींवर हल्ला केला. मात्र आता पर्यंत ट्विटरच्या माध्यमातून विचारलेल्या एकही प्रश्नाचे उत्तर मोदींकडून आले नाही हे विशेष.
सोशल मीडियावर सक्रीय झालेले राहुल गांधी रोज ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर खोचक शब्दात टीका करतात. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विटरवरुन मोदी सरकारला रोज एक प्रश्न विचारत आहे. राहुल गांधींचे ट्विट हे माध्यमांमध्येही चर्चेचा विषय असतात. जुमलों की बेवफाई मार गई, नोटबंदी की लुटाई मार गई, GST सारी कमाई मार गई, बाकी कुछ बचा तो, महंगाई मार गई असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. नोटाबंदीच्या लुटीने मारले, जीएसटीमुळे मेहनतीची कमाई खाल्ली, मग जे काही उरले ते महागाईत गेले असा या ट्विटचा आशय होता. मात्र ट्विटसोबत छायाचित्रात दिलेल्या आकडेवारीचे गणितच चुकले होते. २०१४ आणि २०१७ मधील गॅस सिलिंडर, डाळ, टोमॅटो, कांदा, दूध आणि डिझेलच्या दरातील तफावत दाखवण्यात आली. तफावत दाखवताना टक्केवारीचा आधार घेण्यात आला होता. मात्र ही टक्केवारीच चुकली होती.
उदाहरणार्थ, २०१४ मध्ये गॅस सिलिंडरचे दर ४१४ रुपये होते. तर २०१७ मध्ये हेच दर ७४२ रुपयांपर्यंत पोहोचले. टक्केवारीनुसार ही वाढ ७९.२२ टक्के होती. पण राहुल गांधींच्या ट्विटमध्ये १७९ टक्क्यांनी वाढ झाली असे म्हटले होते. डाळीच्या बाबतही असाच प्रकार झाला. २०१४ मध्ये डाळीचे दर ४५ रुपये प्रति किलो एवढे होते. तर २०१७ मध्ये हेच प्रमाण ८० रुपये प्रति किलोंपर्यंत पोहोचले. राहुल गांधींच्या ट्विटनुसार ही वाढ १७७ टक्के होते. मात्र प्रत्यक्षात टक्क्यांमध्ये ही वाढ ७७.७७ टक्के इतकी होते.
ट्विटमधील टक्क्यांचे गणित चुकल्याचे लक्षात आल्यावर हे ट्विट डिलीट करण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांनी नवीन ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी टक्केवारीत तफावत दर्शवण्याऐवजी रुपयांमध्ये तफावत दर्शवली.
22 सालों का हिसाब#गुजरात_मांगे_जवाब
प्रधानमंत्रीजी-7वाँ सवाल:
जुमलों की बेवफाई मार गई
नोटबंदी की लुटाई मार गई
GST सारी कमाई मार गई
बाकी कुछ बचा तो –
महंगाई मार गईबढ़ते दामों से जीना दुश्वार
बस अमीरों की होगी भाजपा सरकार? pic.twitter.com/1S8Yt0nI7B— Office of RG (@OfficeOfRG) December 5, 2017
मोदींवर टीका करताना ‘गणित’ चुकल्यानंतर सोशल मीडियावर त्यांची खिल्लीदेखील उडवण्यात आली. तर मोदींनीही यापूर्वी चुकीचे ट्विट केले होते, अशी आठवण काहींनी करुन दिली.