भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४४ वी जयंती देशभर साजरी होत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते. वकिली करत असताना महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. गुजरात येथील खेडा, बोरसद आणि बार्डोली गावातल्या गावकऱ्यांना संघटित करुन त्यांनी इंग्रजांविरोधात सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारत छोडो आंदोलनातही सरदार वल्लभभाई पटेल आघाडीवर होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री हे पद सरदार वल्लभभाई पटेल यांनी भुषवले. देशाची फाळणी झाल्यानंतर जो हिंसाचार उफाळला होता. त्या हिंसाचारानंतर शांतता प्रस्थापित करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या मुत्सदेगिरीसाठी ते प्रसिद्ध होते. अनेक संस्थाने त्यांनी भारतात विलीन केली आणि त्याचमुळे त्यांना लोहपुरुष असे संबोधले जाते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वातंत्र्यलढ्यात सरदार पटेल यांचा मोठा वाटा होता. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीतही त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून गेल्या वर्षी त्यांचा पुतळा गुजरात या ठिकाणी उभारण्यात आला. या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव देण्यात आले आहे. हा पुतळा न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही मोठा आहे.