मुंबई : भाजपा आणि शिवसेनेमध्ये सध्या सत्तेच्या वाटपावरून वाद सुरु आहे. या सगळ्या घडामोडींवर बोलताना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. सत्ता स्थापनेवरुन पत्रकारांना उत्तर देताना सांगितले की, जे जे शक्य होईल ते करणारच.
आज विधिमंडळात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांनी निवड केली. शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर अडून बसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. असं असतानाही महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा फडणवीस यांनी विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर तडजोड करण्यास तयार नसल्याचे संकेत देणारे वक्तव्य केले आहे. ‘सत्ता स्थापनेसाठी जे जे शक्य होईल ते करणारच’ असं वक्तव्य करुन उद्धव यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपाने अद्याप शिवसेनेशी संपर्क केलेला नसल्याचीही माहिती समोर आली आहे.