मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज मुंबईतल्या मुलुंडमध्ये जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे. कठुआ,उनावा बलात्कार प्रकरण, नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सुरक्षा आदींमुळे राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र !
रविवार दि. १५ एप्रिल २०१८ रोजी सायं.५.३० वा.
मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांची ‘जाहीर सभा’.
आर.आर.टी. रोड, भाजी मंडई, मुलुंड (प.) रेल्वे स्थानकाजवळ.
‘१०० महिला रिक्षा चालकांना’ रिक्षा वाटप करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. pic.twitter.com/LVSMnS4clq— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 14, 2018
मनसेच्या वतीने मुंबईतल्या महिलांना शंभर रिक्षाचं वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्तानं राज ठाकरेंची ही सभा होणार आहे. भाजी मार्केट परिसरात संध्याकाळी ६ वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेंचं राजकीय वजन चांगलंच वाढलं आहे. आपल्या राजकीय सभांमधून त्यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.त्याशिवाय आपल्या कुंचल्यातूनही त्यांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावर फटकारे ओढले आहेत. मार्च महिन्यात शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यातही त्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली होती.”भारताला १९४७ साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य १९७७ साली मिळालं आणि आता २०१९ साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,” असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली होती.
दुसरीकडे शनिवारी नाणार ग्रामस्थांनी शनिवारी राज ठाकरेंची भेट घेऊन, त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी नाणार ग्रामस्थांच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिलं आहे. ‘सरकारकडून प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल.’ असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.