मुंबई : गुपचूप मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकरणा-या देवेंद्र फडणवीसांनी 78 तासात राजीनामा दिला. राजीनामा देण्याची नामुष्की का आली. त्याला मुख्य कारण आहे. अजित पवारांनी दिलेला शब्द पूर्ण करु शकले नाही. फडणवीसांकडे बहुमताचा आकडा नसल्यामुळे फडणवीस सरकार तोंडावर आपटले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जनतेने विधानसभा निवडणुकीत युतीला संपूर्ण बहुमताचा जनादेश दिला. आम्ही सेनेसोबत निवडणूक लढलो. मात्र, हा जनादेश भाजपला होता. कारण एकूण लढलेल्या जागांपैकी विजयाचं प्रमाण शिवसेनेच्या तुलनेत भाजपचं अधिक आहे. जे लोकं मातोश्रीबाहेर पडत नव्हते ते इतरांच्या पायऱ्या झिजवत होते. आमच्याशी बोलत नव्हते. अशातच राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं. मात्र, आम्ही आमच्याकडे संख्याबळ नसल्याचं सांगत सत्ता स्थापनेस नकार दिला. राज्यपालांनी शिवसेनेला बोलावलं. त्यानंतर त्यांचं कसं हसं करुन घेतलं ते महाराष्ट्रानं पाहिलं. राष्ट्रवादीला देखील बोलावण्यात आलं मात्र त्यांनी देखील नकार दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, हे तिन्ही पक्ष विरोधी विचारधारेचे असल्यानं हे सरकार टीकणार नव्हतं.”
अजित पवार यांनी आम्हाला सरकार स्थापनेस मदतीची तयारी दाखवली. त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं. त्यामुळे आम्ही चर्चा करुन सरकार स्थापन केलं. मात्र, त्यांनी काही कारणांमुळे राजीनामा दिला. आता आमच्याकडे देखील बहुमत उरलेलं नाही. म्हणून मी देखील माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी माहिती फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली.