मुंबई – गुजरात निवडणुकीत भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत असल्याची टीका शिवसेनेने मुखपत्र सामनामधून केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप होत असेल, तर आरोप करू नये, थेट कृती करावी असा सल्लाही सामन्यातून देण्यात आला आहे.
सामनाच्या आग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर चांगलीच टीका केली आहे. ”गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत पाकड्यांचा हात व जीभ वळवळत असेल तर फक्त प्रचार सभांतून आरोपांचा धुरळा न उडवता पंतप्रधानांनी या वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवायला हवी. पुन्हा पाकच्या हस्तक्षेपावर प्रचारसभांतून का बोलता? असा हस्तक्षेप सुरू असेल तर पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.
‘गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मोदी यांची चिंता समजण्यासारखी आहे, पण पंतप्रधानांनी आरोप करायचे नसतात, कृती करायची असते. गुजरात निवडणुका या कश्मीर प्रश्नापेक्षा महत्त्वाच्या ठरत आहेत. कालपर्यंत कश्मीरात पाकिस्तानचा हस्तक्षेप होता. लेह, लडाख, अरुणाचलमध्ये चीनचा हस्तक्षेप होता. तो कमी होण्याऐवजी अलीकडे जास्तच वाढला आहे. कधी नव्हे ते सिक्कीमच्या सीमा पार करून चिनी सैन्य डोकलामपर्यंत घुसले होते. पण गुजरातच्या निवडणुकीतही पाकचा हस्तक्षेप वगैरे अचानक वाढला असेल, तर मोदी यांच्या चिंतेची आम्हालाही काळजी वाटत आहे’ असेही सामनात नमूद करण्यात आले आहे.
‘पालनपूर येथील एका सभेत मोदी यांनी अशी ठिणगी टाकली की, पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ काय? असा खडा सवाल मोदी यांनी विचारला आहे व तो शतप्रतिशत योग्य आहे. भारताच्या एखाद्या राज्यात कोणी मुख्यमंत्री व्हायचे व कोणी नाही हा चोंबडेपणा करण्याचा अधिकार पाकड्यांना कोणी दिला? पाकड्यांनी आज अहमद पटेलांचे नाव घेतले. त्यांनी काशीनाथ रुपाला किंवा भरतसिंह सोलंकी यांचे नाव घेतले असते तरीही ते योग्य नाही. अर्थात अहमद पटेल यांच्या नावाचा उद्धार करून गुजरात निवडणुकीत कुणी हिंदू-मुसलमान मतांची फाळणी करून निवडणुका जिंकू पाहत आहेत का, हादेखील प्रश्न उद्या उपस्थित होऊ शकतो’ असेही सामानात म्हटले आहे.