मुंबई: शिवाजी महाराजांचा पुतळा छत्राशिवाय उभा आहे. ते शिवसेनेला पाहावत नाही. म्हणून आम्ही या पुतळ्यावर छत्र उभारण्याची मागणी करतो आहोत. मात्र त्याकडे गेल्या चार वर्षांपासून दुर्लक्ष होते आहे. कुवत नसल्यास सांगा शिवसेना या ठिकाणी रायगड उभा करेल असा इशाराच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या तीन चार वर्षांपासून शिवजयंतीचा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्यासाठी छत्र उभारले जावे अशी मागणी शिवसेनेतर्फे होते आहे. मात्र जीव्हीके, एअरपोर्ट अॅथॉरिटी आणि सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करते आहे. उन्हात, पावसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्राशिवाय उभा आहे. तसेच शिवरायांच्या पुतळ्यावर छत्रही नाही हे देखील आम्हाला सहन होत नाही. ते छत्रही बसवण्याची कुवत नसेल तरीही सांगा शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहाणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी आपण दरवर्षीच इथे येतो. शिवजयंती हा मराठी माणसासाठी दसरा, दिवाळी गुढीपाडवा या सणांसारखा एक सण आहे. शिवसैनिक शिवजयंती एखाद्या सणाप्रमाणे, उत्सवाप्रमाणे साजरी करतात याचा अभिमान वाटतो असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते आहे. शिवसेनेतर्फे अंधेरी या ठिकाणी विमानतळ परिसरात रायगडाची प्रतिकृती उभारण्यात आली. त्याच ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात येतो आहे. यावेळी क्रेनमध्ये चढून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.