मुंबई – पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर आज सकाळी तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. संजान आणि उंबरगाव स्थानकादरम्यान ही घटना घडली. रेल्वे रुळाला तडे गेल्याचे त्वरित लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, रेल्वे रुळाला तडे गेल्याने गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रूळाला तडे गेल्याने या मार्गावरील वाहतूक त्वरित थांबविण्यात आली. दरम्यान, रूळ दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून या रेल्वे मार्गावर गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आलेल्या आहेत. या घटनेमुळे वलसाड एक्सप्रेस अर्धा तास उशिराने धावत आहे. रूळ तुटल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.