मुंबई: नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत नोटाबंदीच्या घोषणेच्या काही तासांपूर्वी ९० कोटी रुपये जमा केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मजीद मेमन यांनी केला आहे. यामुळे पुन्हा नीरव मोदी सरकारच्या कनेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
“नीरव मोदीने जेव्हा भारतातून पलायन केले त्यावेळी अशी बातमी आली होती, की नोटाबंदीच्या घोषणेच्या काही तासांपूर्वी नीरव मोदीने पीएनबीच्या एका शाखेत ९० कोटी रुपयांची रोख जमा केली होती. कदाचित त्याने सोने-चांदीच्या बदल्यात ही रोख जमा केली असावी. याविषयी योग्य तपासणी व्हायला हवी व यामागचे सत्य पडताळून पाहायला हवे.” असे मेमन यांनी सांगितले.
मेमन यांनी ही बाब ट्विटरवर निदर्शनास आणून यामागे आरोपी व भाजप यांचे साटेलोटे असण्याची शंका व्यक्त केली. या महिन्याच्या सुरूवातील उघड झालेल्या या घोटाळ्यात नीरव मोदीने बँकेचे ११,४०० कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मोदीचा काका मेहुल चोक्सी हादेखील आरोपी आहे. पीएनबीने मोदी, त्याचे कुटुंबीय व गीतांजली ज्वेलर्स यांच्या विरोधात ११,४०० कोटी व २८० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या दोन तक्रारी नोंदवल्या आहेत.