मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पाच वर्षात दाखल करण्यात आलेले सर्व अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. यामध्ये मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबतही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अशी माहिती नामदार एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच विविध प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. राज्यात गेल्या पाच वर्षात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येईल. गुन्हे मागे घेताना कोण कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहिलं जाणार नाही, असं सांगतानाच मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
राज्यातील विकास प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं हे ठरवण्यात येणार आहे. मात्र राज्यातील एकाही विकास प्रकल्पाला स्थगिती दिली जाणार नाही, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक शेतकरी हवालदिल आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरही चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.