मुंबई : भाजपमध्ये सध्या नाराज नेत्यांमुळे वादळ उठलं आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता हे नाराज नेते सध्या पक्षावर नाराज आहेत. भाजपच्या पराभवला खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार ठरवलं आहे.
पकंजा मुंडे यांची आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यांची ही भेट तब्बल दीड तास चालली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी फडणवीसांचा नाव न घेता हल्लाबोल केला. जो पक्षाचं नेतृत्व करतो त्यालाच जबाबदार धरलं जातं. जिंकला की सर्व श्रेय त्याचं आणि हरला की दुसऱ्यांवर जबाबदारी टाकता येत नाही असंही ते म्हणाले. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवाला भाजपमधलेच काही लोक जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला. खडसे म्हणाले, भाजपच्याच काही लोकांनी योग्य पद्धतीने कामं केली नाहीत त्यामुळेच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. पंकजा मुंडे यांचंही असंच मत आहे.
याबाबत पक्षातल्या ज्येष्ठांशी अनेकदा बोललो आहे. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई होईल अशी आशा आहे. पक्षातल्या ओबीसी नेत्यांना डावललं जातंय असंही त्यांनी सूचित केलं. पंकजा मुडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता अशा सगळ्यांनाच डावललं जातंय ते काय आहे असा सवालही त्यांनी केला. त्याचबरोबर पक्षातले सगळे नाराज हे कायम एकत्रच येत असतात असंही ते म्हणाले.