मुंबई : विधानसभेत भाजपासोबत युती करणाऱ्या शिवसेनेला चांगलाच झटका बसला. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले. यामुळे एकच खळबळ उडाली.
देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना थंड करण्याची गर्जना केली होती. सेना-भाजपाची युती झाली असली तरी नाराजी आणि बंडखोरीचा फटका बसत असल्याचे पहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेमधून नाराजीचा सूर समोर आला आहे. तिकीट वाटपावरून स्थानिक नेत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. २६ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. या नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने शिवसेनेसह भाजपाच्याही अडचणी वाढल्या आहेत.
स्थानिक नेते धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ सर्वांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नेत्याला मिळावी अशी या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे बोडारे समर्थकांची नाराजी समोर आली आहे. बंडखोरीचा व नाराज कार्यकर्ते आणि पदाधिका-यांचा शिवसेना-भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.