मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. राज्यात शिवसेनेचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी व्यक्त केला.
सोमवारी राज्यपालांची भेट आम्ही घेतली त्यांना राज्यातली परिस्थिती मांडली. सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्राचा निर्णय आता महाराष्ट्रच घेईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकार स्थापनेचं काय होणार हा पेच जैसे थेच आहे.
‘ही सत्याची लढाई असून, विजय आमचाच होईल. राज्याचा निर्णय राज्यातच होणार’, असे सांगताना, ‘राज्याचा चेहरा आता बदलत असून मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार’, अशा शब्दात राज्यात शिवसेनेचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. लवकरच नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार असून शपथग्रहण ही कुणाची मक्तेदारी नाही, ग्रहण लागले आहे ते आता सुटणार आहे, असे सांगत राऊत यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. लवकरच राज्याच नवे सरकार स्थापन होईल आणि ते सरकार राज्यातील जनतेच्या मनाप्रमाणे स्थापन होईल, त्यानंतर राज्याचा चेहरामोहराच बदलणार असल्याचेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राऊत म्हणाले.