मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मिशन २०२२ हाती घेतलं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. मिशन २०२२ हे शिवसेना-काँग्रेसला धक्का देण्यासाठी आहे, हा चुकीचा प्रचार केला जात आहे. विरोधी पक्ष आपली महाविकास आघाडी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही ‘दिवार तुटती क्यू नहीं’ असं विरोधकांना वाटलं पाहिजे. आपल्याला एकमेकांबद्दल विश्वास वाटला पाहिजे. शिवसेना महापालिकेत एक नंबरला राहिला पाहिजे, तो आपला मित्र पक्ष आहे. मात्र राष्ट्रवादी दोन क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
मुबंई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आज रविवार (१ मार्च ) रोजी सोमैय्या मैदान, चुनाभट्टी सायन, मुंबई येथे संपन्न होत आहे. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक ८ वरुन ६० झाले पाहिजेत, मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे आजवर जास्तीत जास्त १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. वॉर्डात काम केलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. महिन्यातला एक दिवस मुंबईला देणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितंल.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराला उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks व खा. @praful_patel व राज्यमंत्री @iAditiTatkare यांच्या उपस्थितीत आज दिमाखात सुरुवात झाली. शिबिराला ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपलब्ध होते. pic.twitter.com/iqyvxntO45
— NCP Mumbai (@MumbaiNCP) March 1, 2020
पक्षाची बदनामी होईल असं काम करु नका…
पक्षाची बदनामी होईल आणि पवार साहेबांना मान खाली घालावी लागेल, असं काम करु नका. मुंबईचे नवाब मलिक आणि नरेंद्र वर्मा सोडले तर बाकीचे अध्यक्ष आपल्याला सोडून गेले. त्यांचा काही उपयोग नाही. सचिन अहिर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, संजय पाटील यांना सगळं दिलं मात्र ते निघून गेले. आपलं सरकार आलं म्हणून चिकटायला आले तर अशांना जवळ करु नका. दोन वर्षे वाट बघा तो आपल्याबरोबर राहतो की नाही. त्यामुळे आता अशी माणसं शोधू जी सरकार असो किंवा नसो, सोडून जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं.