मुंबई : मुंबईतील साकिनाका परिसरातील मोईली व्हिलेज या परिसरातील झोपडपट्टीवासियांना पुनर्विकासाचा करार करा नाही, नाही तर घरे खाली करा, अशा आशयाची धमकीवजा नोटीस दिल्या जात असून हे अत्यंत धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. वास्तविक हा विभाग हरित पट्ट्यात येत असल्याने पुनर्विकास कसा होऊ शकतो. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या मतदारसंघातील कॉग्रेसचे आमदार आणि विधानसभेतील उपनेते नसीम खान यांच्यासोबत त्यांनी या विभागाची बुधवारी पाहणी केली. या विभागातील नागरिकांशी चर्चा करून वडेट्टीवार आणि खान यानी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हीलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी विधानसभेत केली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेवून कागदपत्रे पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वासन दिले होते मात्र तरीही नागपूरच्या संचेती नावाच्या विकासकाने आपली मनमानी सुरूच ठेवली असल्याचे सांगत नसीम खान यांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हीलेज येथील12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मुळ मालक 40 वर्षांपुर्वि ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही. म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यांशी हातमिळवणी करून जागा खाली करा , अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्या आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या महापालिकेच्या अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार आणि नसिम खान यांनी केली. दरम्यान, या भागात साचणा-या पाण्यामुळे नागरिकांचे होणारे हाल आणि त्यांची परिस्थीती याबाबत त्यांनी रहिवाशांशी चर्चा केली.