मुंबई – कोरेगाव भीमा प्रकरणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, या मागणीकरता डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी या मोर्चात सहभागी होणाऱ्या आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे.
भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर हे कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसेबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडे संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करीत आहेत. पण, त्यांची ही मागणी पूर्ण होत नसल्याने २६ मार्चला आंबेडकरांनी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मोर्चाची घोषणा केली होती. त्याला अनुसरून पोलिसांनी या पायी निघणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारली. मात्र, हा मोर्चा थेट आझाद मैदानात काढून आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आठवड्याचा पहिला दिवस, सकाळच्या सत्रातील दक्षिण मुंबईकडे जाणारी मोठी वाहतूक आणि या अगोदर आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या वेळी घडलेल्या हिंसक घटना लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.