मुंबई : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरुद्ध विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरवावरुन विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. यामुळे विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. सत्ताधारी हे नियम आणि प्रथा-परंपरेच्या विरुद्ध कामकाज करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाची कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी विश्वास दर्शक ठराव आणून नियमाची पायमल्ली केली. मुख्यमंत्री फडणवीस हे २००६ चा विलासराव देशमुखांच्या वेळेसचा दाखला देतात. मात्र २००६ ला तक्तालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांच्या मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यांनी अध्यक्षांच्या बाजूने ठराव मांडला नव्हता. आता आम्ही अध्यक्षांच्या विरूद्ध ठराव मांडला आहे. त्यामुळे २००६ ची आणि आताची तूलना होऊ शकत नाही, असे सांगत विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांनी या विषयावर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाषणे केली. यावेळी संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन देताना सांगितले की, आम्ही जे कामकाज करीत आहोत ते नियमानुसार केलेले असून त्यामध्ये कोणतेही चूकीचे काम केलेले नसल्याचे सांगत हा प्रश्न निकाली निघाला असल्याचे सभागृहात सांगितले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर विरोधी पक्षांतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सुरूवातीला १० मनिटीसाठी आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.