नवी मुंबई : माहिम बीचवर बॅगमध्ये मृतदेह सापडल्याची घटना ताजी असताना पनवेल तालुक्यातील हरिग्राम ते पनवेल मार्गावरील गाढी नदीच्या पात्राजवळ काळसर रंगाच्या रेग्झिन बॅ रेग्झिन बॅगम गमध्ये एका आज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पनवेल तालुक्यातील हरिग्राम भागातील तरुण सोमवारी सायंकाळी गाढी नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी जात असताना, त्याला गाढी नदीजवळ काळया रंगाच्या रेग्झिन बॅगेतून मानवी हात बाहेर आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत रेग्झिन बॅगेमध्ये आढळून आलेल्या ३० ते ३५ वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह पूर्णपणे कुजल्याचे आढळून आले. तसेच या व्यक्तीच्या अंगावर काळया रंगाचे कपडे असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या व्यक्तीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रेग्झिन बॅगेत कोंबून तो पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी टाकून दिला असल्याचे आढळून आले. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. पोलिसांनी आता या हत्या प्रकरणातील मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.