मुंबई: किसान सभेचा मोर्चा विविध मागण्यांसाठी आज (सोमवार) मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्व राजकीय पक्षही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. अभिनेत्री हुमा कुरेशीनेही शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चाचे समर्थन करत ट्विट केले आहे. शेतकरी मोर्चाचा फोटो शेअर करत तिने ट्विटमध्ये लिहिले की, ‘या शांततापूर्ण आंदोलनाला आपलाही पाठिंबा दर्शवूया. क्षुल्लक राजकारणाला बाजूला ठेवूया. यावर तोडगा काय आहे, याचा विचार करूयात.’ अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत या मोर्चाचं समर्थन करत ‘जय किसान’ असा नाराही दिला आहे.
Let’s all show respect to this peaceful moving mass protest …Let us set aside petty politics … Where is the solution ?? #KisanLongMarch #Democracy pic.twitter.com/9ErGkwkLT4
— Huma Qureshi (@humasqureshi) March 11, 2018
शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, कृषिपंपाचे वीजबिल माफ करा, स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईत ३० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला आहे. मुंबईकर आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे शेतकरी रात्रभर पायपीट करत सोमय्या मैदानातून आझाद मैदानात पोहोचले. एकीकडे मोर्चा काढताना सर्वसामान्यांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढत असताना शेतकऱ्यांमधील या माणुसकीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
रितेशनेही दिला ‘जय किसान’चा नारा,……..
हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीचं प्रतिनिधीत्त्व करणारा अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत या मोर्चाचं समर्थन करत ‘जय किसान’ असा नाराही दिला आहे.
‘जवळपास ५० हजार शेतकरी त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून १८० किलोमीटरचा पायी प्रवास करुन इथे आले आहेत. या मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी फक्त आणि फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये कोणतीही अडचणीची परिस्थिती उदभवू नये याची काळजी घेत रात्रीच आपला प्रवास केला. त्यांच्या या वृत्तीला आणि भूमिकेला माझा सलाम…’, असं ट्विट करत रितेशने ‘जय किसान’ या नाऱ्याचा उल्लेखही केला.
50,000 farmers walked 180kms, asking for the rightful compensation for their crop. On their last stretch they walked all night making sure they didn’t disturb the SSC board examinations. #Compassion #respect #Salute #JaiKisan – 🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/epa0a90A6u
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 12, 2018
बळीराजाप्रती नेहमीच आपली आत्मियता दाखवत करत त्यांच्याप्रती रितेशने नेहमीच आदराची भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या भव्य मोर्चानेच सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. एकिकडे हुमा कुरेशी आणि रितेश देशमुख या कलाकारांनी शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. पण, या साऱ्यात मराठी कलाविश्वातून अजूनही सेलिब्रिटी याविषयी पुढे येऊन आपली भूमिका का मांडत नाहीयेत हाच प्रश्न नेटकऱ्यांनी मांडला आहे.