मुंबई: शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या रास्त मागण्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्या कालबध्द पध्दतीने सोडवण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
विरोधकांच्या प्रश्नावरील उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. या मागण्या सरकार कालबध्द पध्दतीने सोडवणार. शेतकरी यांचे सर्व प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. या विषयावर सरकार संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
किसान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सभागृहात विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, शिवसेनेचे शंभुराजे देसाई यांनी या विषयावर भाषणे केली. सरकारने हा विषय गंभीरपणे घ्यावा, अशी मागणी केली होती.