गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-10 च्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या मार्गाची एकूण लांबी 9.209 किमी आहे. यापैकी 8.529 किमी उन्नत तर 0.68 किमी भुयारी मार्ग आहे. यामध्ये एकूण 4 उन्नत स्थानके असतील. प्रकल्पाची किंमत सुमारे 4 हजार 476 कोटी रुपये इतकी आहे. मार्च 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पासाठी एमएमआरडीए व राज्य सरकार यासह आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे अर्थसहाय्य घेण्यासाठीही मान्यता देण्यात आली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएला नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी 14 लाख 32 हजार दैनंदिन प्रवासी सीएसएमटी-वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख-शिवाजी चौक (मिरा रोड) या मार्गाचा वापर करण्याची शक्यता असून 2031 पर्यंत ही संख्या 21 लाख 62 हजार होईल, असा अंदाज आहे. वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे-घोडबंदर परिसरातील वाढत्या नागरीकरणाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबई, बोरिवली, मिरा-भाईंदर, ठाणे ही शहरे जोडली जाऊन मेट्रोचे वर्तुळ पूर्ण होईल आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.