मुंबई: युतीमध्ये पेच कायम असताना आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार हुसैन दलवाई आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात बैठक झाली. भाजपचं सरकार येऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचं दलवाईंनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.
भाजप सरकारने महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकापासून 13 व्या क्रमांकावर नेऊन ठेवले. भाजप सत्तेचा गैर वापर करत आहेत. विरोधकांना धमकावत आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून लांब ठेवणे गरजेचं आहे. अशी आपली मागणी आहे. असंही हुसेन दलवाई यांनी सांगितलं.
भाजपने सत्तास्थापन करावे. सर्वात मोठा पक्ष आहे. ते 230 पार बोलत होते. त्यांनी जनतेशी गद्दारी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु देणार नाही असेही हुसैन दलवाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत निर्णय घ्यावा, असं हुसैन दलवाई यांनी राऊत यांच्या भेटीनंतर सांगितलं.
काँग्रेस महाआघाडी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस महाआघाडीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.