मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारी निवासस्थान वर्षा बंगला रिकामा करायचा होता. मात्र, त्यांना आणखी तीन महिने या बंगल्यात वास्तव्य करता येणार आहे. फडणवीसांच्या मागणीनुसार त्यांना वाढीव मुदत देण्यात आली. त्यामुळे फडणवीसांचा मुक्काम वाढला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागानं एक परिपत्रक जारी करून सर्व मंत्र्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत मंत्रालयातील कार्यालये रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मंत्र्यांनी एका दिवसाच्या आतच मंत्रालयातील आपापली कार्यालये रिकामी केली. फडणवीसांनी यासाठी अर्ज केला होता आणि तो मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात कोणताच पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही. त्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी या शिफारशीच्या फाइलवर स्वाक्षरी केली. त्यामुळं आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काही माजी मंत्र्यांनी मलबारस्थित बंगले रिकामे करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितली आहे. तर मंत्रालयासमोरील बंगले रिकामे करण्याची काही मंत्र्यांनी तयारी सुरू केली आहे.