मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल शुक्रवार ( २० मार्च )पासून बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच ट्रान्स हार्बरवरील एसी लोकल देखील शुक्रवारपासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
एसी लोकल बंदिस्त असते, त्यामुळे एखाद्याच्या शिंकण्यामुळे बाहेर पडणारे जंतूंना लोकलच्या बाहेर पडण्यास वाव नसतो. त्यामुळे त्याचा कुणालाही संसर्ग होऊ शकतो. शिवाय एसी लोकलचं तापमान अत्यंत कमी असल्याने संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एसी लोकल बंद करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं. एसी लोकल बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी प्रवाशांच्या हितासाठीच हा रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. ट्रान्स हार्बरवर ठाणे-वाशी, ठाणे-नेरूळ आणि ठाणे-पनवेल दरम्यान एकूण १६ एसी लोकल धावतात. या सर्व एसी लोकलही उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ४९वर पोहोचला आहे. तर देशातील करोना रुग्णांची संख्या १७७ वर गेला आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागरिकांशी संवाद साधत विशेष काळजी घेण्याचं आणि गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे.