मुंबई: भिमा-कोरेगाव घटनेसंदर्भात मिलिंद एकबोटे यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यात सरकारचे कोणतेही श्रेय नाही. पण आता एकबोटे यांच्याप्रमाणेच भिडे यांच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, आमदार प्रकाश गजभिये यांनी २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला यावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र चर्चा नाहीच हा स्थगन प्रस्तावच सभापतींनी फेटाळून लावला.
दरम्यान विधानपरिषदेमध्ये नियम ९७ अन्वये मुख्यमंत्र्यांनी भिमा कोरेगावप्रकरणी निवेदन केले होते. या निवेदनात तक्रार दाखल असलेले संभाजी भिडे यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. मुख्यमंत्र्यांनी संभाजी उर्फ मनोहर भिडे यांना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्या नावाचा उल्लेख टाळला असा आरोपही यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानपरिषदेत केला.