मुंबई : चेंबूरमध्ये मुलगी बेपत्ता प्रकरणावरून मंगळवारी उद्रेक झाला होता. नागरिकांनी दगडफेक,रास्तारोको करुन पोलिसांवर हल्ला केला होता. या प्रकरणी आज बुधवारी 33 जणांना अटक करण्यात आली. 200 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणाऱ्या पंचाराम रिठाडिया (40) यांची 17 वर्षीय मुलगी सुमारे सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली. याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने तिचे अपहरण केल्याचा पंचाराम यांना संशय होता. याबाबत त्यांनी नेहरूनगर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही मुलीचा शोध लागला नव्हता. आरोपीचे कुटुंबीय धमकी देत असल्याचा आरोप पंचाराम यांनी केला होता. रोजच्या त्रासाला कंटाळून पंचाराम यांनी 13 ऑक्टोबरला रात्री टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरात लोकलखाली उडी घेत आत्महत्या केली होती.
बेपत्ता मुलीचा शोध न लागल्यामुळे तिच्या वडिलांच्या आत्महत्यामुळे नागरिकांनी मंगळवारी कुर्ला-चेंबूर परिसरात आंदोलन केले होते. संतप्त जनसमुदायाने पोलिसांवर दगडफेक केली होती. वाहनांची तोडफोड करीत या जमावाने चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोकोही केला होता. आंदोलनकर्ते अधिकच हिंसक बनत असल्याचे पाहून अतिरिक्त कुमक मागवून पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता.
चेंबूरच्या कालच्या गोंधळामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी धरपकड सुरु झाली असून, 33 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर 200 आंदोलकांवर गुन्हे दाखल करुन त्यांचा शोध पोलीस करत आहे.