भारत-पाक सिमेवर महाराष्ट्राती अहमदनगर जिल्ह्यातील जवान पाकिस्तानी लष्करांच्या गोळीबारात शहीद झाले. नायब सुभेदार सुनील रावसाहेब वाल्टे ( 40 ) असे जवानांचे नाव आहे. सुनील मूळचे अहमदनगरमधील दहिगाव गावचे निवासी होते. त्यांच्या मागे पत्नी आई, वडील, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर नौशेरा सेक्टरमध्ये मंगळवारी नियंत्रण रेषेवर अंधारात संशयित हालचाली सुरु होत्या. यावेळी दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर भारतीय लष्कराकडूनही तात्काळ उत्तर देत मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात पाकिस्तान लष्कराचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या गोळीबारात नायब सुभेदार सुनील गंभीर जखमी झाले होते. मात्र उपाचारादरम्यान ते शहीद झाले. शहीद वाल्टे यांचा लष्करातील सेवाकाळ संपला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी पाच वर्षांसाठी आपली कामाची मुदत वाढवून घेतली होती. लवकरच ते निवृत्त होणार होते. हे वृत्त अहमदनगरमध्ये धडकताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.