मुंबई: शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेचवर सुरु आहे. शिवसेना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही. याला जबाबदार भाजप आहे, असं थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.
शिवसेना-भाजपच्या गोंधळामुळे सरकार स्थापन झालं नाही. या गोंधळावर काँग्रेस महाआघाडीच्या नेत्यांचं खलबतं सुरु आहेत. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची बैठक होत आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधींना सांगितल्याची माहिती माध्यमांना दिली. आम्ही काही रणनीती बनवली आहे, राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधी यांना कळवली आहे, असं थोरात म्हणाले.
विधानसभेच्या निवडणुकीत जनमत भाजपच्या विरोधात गेलं आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सरकार बनलं पाहिजे, भाजपने बनवावं, पण सध्या तसं घडताना दिसत नाही. याला कारण भाजप आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही,याला जबाबदार भाजप आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
राष्ट्रपती राजवटीने कोणी घाबरुन जाणार नाही. आमदार फुटतील अशी आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. आता कोणी फुटण्याचे धाडस करणार नाही आणि कोणी फुटलं तर आम्ही सगळे मिळून त्याचा पराभव करु, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिला.
अध्यक्ष निवडीची वेळ आली तर आघाडीचा उमेदवार आम्ही देणार आहोत. जर भाजपने दिलेल्या उमेदवाराचा किंवा अध्यक्षांचा पराभव झाला तर सरकारचा पराभव असतो, असं थोरात म्हणाले.