मुंबई : महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे पिकांच नुकसानं झालं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आला आहे. शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गुरुवारी संध्याकाळी केली.
यावेळी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंसह सर्व शिवसेनेचे आमदार, नेते, उपस्थितीत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही राज्यपालांकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच शेतक-यांना ताबडतोब नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी राज्यपालांनी सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. कमी अधिक प्रमाणात खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. काढणीला आलेली पिके पावसामुळे हिरावली गेली आहेत. त्यामुळे पाणी-चारा टंचाईला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण भागातही पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे शेतमाल सडू लागला आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अपेक्षित किंमत मिळत नसून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने पंचनामे करण्यात यावे. शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.