ठाणे– सध्या राज्यात पळवापळवी सुरु असतानाच प्रविण चौगुले या विटाव्यातील तरुणाने आपल्या नेत्याला त्रास होतोय म्हणून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे समर्थन करणार नाही. पण, त्याने दाखवून दिलेली ही स्वामिनिष्ठा महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारी आहे. त्यामुळे त्याला माझा सलाम आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी प्रविण चौगुले या तरुणाला आदरांजली अर्पण केली आहे.
राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर अस्वस्थ झालेल्या विटाव्यातील प्रविण चौगुले याने आत्मदहन केले. याबाबत आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ पोस्ट करुन प्रविण चौगुले याला आदरांजली अर्पण केली आहे.
आव्हाड म्हणाले की,“जागोजागी निष्ठेची विष्ठा होताना दिसतेय;पळवा-पळवी सुरु आहे.40-40 वर्षे लोकं सत्तेत आहेत. ते आता सोडून जाताहेत; अन् अचानक बातमी येते की प्रविण चौगुले नावाच्या मनसैनिकाने आत्महत्या केली. आपल्या नेत्याला त्रास होतोय; आपला नेता अस्वस्थ आहे. आपला नेता कुठे तरी अडचणीत आहे. ही अस्वस्थता त्याला इतकी सतावत होती की त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणे चूकच आहे; त्याचे समर्थन करीत नाही. पण, ही स्वामिनिष्ठा कुठे बघायला मिळणार? आपल्या नेत्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर; आपल्या नेत्याला काही होता कामा नये, ही भावना आजच्या युगामध्ये दिसते कुठे? खासकरुन महाराष्ट्रात जे काही चालू आहे. तिथे तर ही निष्ठा दिसतच नाही. प्रविण चौगुलेकडे सत्ता नाही, पैसा नाही, आधार नाही. घर नाही; मायबाप नाही; काही नाही. पण, फक्त नेत्याच्या प्रेमापोटी या माणसाने आपला जीव दिलाय. निष्ठेचे एवढे मोठे उदाहरण मी गेल्या कैक वर्षात पाहिलेले नाही. सलाम प्रविण चौगुलेला अन् नशीबवान राज ठाकरे!”
महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रविणने वेगळी दिशा दिलीय; बघूया पुढे काय होतेय ते, असेही आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.