मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकल्याप्रकरणी मुंबई उच्चन्यायालय राज्य सरकारला झापलं.
एल्फिन्स्टन स्टेशनवरील ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं असल्याचं मत उच्चन्यायालयाने व्यक्त केलं. मृतदेहांचाही सन्मान करायला हवा, अशा शब्दात उच्चन्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं. डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना कपाळावर स्केचपेननं नंबर टाकल्याची माहिती यावेळी राज्य सरकारने दिली. जाब विचारणाऱ्या नातेवाईकांवर पोलिसांकडून केसेस दाखल होणं धक्कादायक असल्याचंही मुंबई उच्चन्यायालयाने सांगितलं.
भविष्यात अश्याप्रकारची घटना घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का? असा सवाल उच्चन्यायालयाने उपस्थित केला. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी यंत्रणा अजून सक्षम करण्याची गरजही उच्चन्यायालयाने व्यक्त केली.
आरटीआय कार्यकर्ता प्रदीप भालेकर यांनी मुंबई उच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. केंद्र सरकार, रेल्वेसह इतर प्रतिवादींना उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होत. २९ सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांना प्राण गमवावे लागले होते, तर अनेक जण जखमी झाले होते.