मुंबई : महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला कौलं दिला. आम्ही लवकरच सरकार स्थापन करु. शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. शिवसेनेसाठी भाजपची 24 तास दारं खुली आहेत. अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. त्यानंतर पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सरकार स्थापन करु. फडणवीस यांचीच विधीमंडळाच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. केंद्राच्या मान्यतेनुसार फडणवीसांची निवड करण्यात आली होती. असेही पाटील म्हणाले.
राज्यातील पेचप्रसंगावरून भाजपची कोंडी झाली आहे. शिवसेना आक्रमक झाल्यामुळे भाजपला सत्तास्थापन करण्यात अडचण निर्माण झाली आहे. या सर्व घ़डामोडींवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह, सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडेसह महत्वाचे नेते यावेळी उपस्थितीत होते. यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. यामध्ये राज्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली असेही पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. निकाल लागून 13 दिवस उलटले तरी सुध्दा सत्तास्थापनेवरून युतीचा ताळमेळ बसला नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपा मित्र पक्ष असूनही शिवसेनेला साथ देणार नाही असेच सध्याचे चित्र आहे.