महत्वाचे..
१. उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी
२. प्रकाश आंबेडर आणि त्यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर टीका
३. बसपानेही उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली
मुंबई: २०१९ च्या निवडणुका होण्याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते असेही भाजपा जाहीर करू शकते असे म्हणत भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर टीका केली.
उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात रामजी हे त्यांच्या वडिलांचे नाव समाविष्ट केले. भीमराव रामजी आंबेडकर अशी सही बाबासाहेब करत त्याचाच दाखला देत उत्तर प्रदेशात भीमराव रामजी आंबेडकर असे नाव यापुढे लिहिले जाईल असे एक विधेयक पास करण्यात आले. मात्र याच निर्णयावर प्रकाश आंबेडर आणि त्यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली.
दलितांची मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारने केलेली ही खेळी आहे अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव लिहिण्याचा आदेश आत्ताच का दिला? राम मंदिर प्रश्नावर अपयश आल्यानेच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. तर बाबासाहेब आंबेडकर हे मराठीत सही करताना भीमराव रामची आंबेडकर अशी सही करत एरवी ते बी आर आंबेडकर अशीच सही करत असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारचा हा निर्णय पटला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपाला स्वतःची विचारधारा पसरवायची आहे त्यामुळे हे असे राजकारण केले जात आहे असा आरोप कांचा इलैय्या यांनी केला.
तर बसपानेही उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर भारतातले अनेक दलित आपल्या नावात राम हा शब्द वापरतात. मात्र त्याचा प्रभू रामचंद्रांशी काही संबंध आहे की नाही यावरून वाद आहे. मात्र उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील दलितांची उत्तर प्रदेश सरकारने निराशा केली आहे असेही बसपाने म्हटले आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात केलेला बदल हा चूक सुधारण्याचा प्रयत्न आहे त्याचे राजकारण करू नये असे आवाहन उत्तरप्रदेशाती भाजपाचे मंत्री प्रसाद मौर्या यांनी केले आहे.