महत्वाचे…
१.मनसेच्या फेरीवाला विरुध्द भूमिकेवरुन नाना पाटेकरांनी बाजू मांडली होती २. राज ठाकरे यांनी नानांना फटकारले होते ३.नाना विरुध्द मनसे संघर्ष किती दिवस चालणार याकडे लक्ष
पुणे:‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझे मत मांडले. पण यामुळे राज यांचे काही नुकसान झाले नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं’, असे नाना पाटेकर यांनी म्हटले. पुण्यात झालेल्या ‘एनडीए’च्या दीक्षांत समारंभाला नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.
काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावेळी मुंबईकर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवत होते. अशावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी मात्र फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांविषयी त्यांची भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरे यांनी ज्या विषयांची माहिती नाही, त्यात उगाच चोंबडेपणा करू नये, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली होती. तसेच, त्यांनी नानांची नक्कलही केली होती. ‘वेलकम चित्रपटात नाना पाटेकर यांनी फेरीवाल्याचा अभिनय केला होता. कांदे घ्या, बटाटे घ्या असं नाना त्या चित्रपटात म्हणत होता. म्हणूनच बहुधा नानाला फेरीवाल्यांचा पुळका आला असावा’ असे ठाकरेंनी म्हटले होते.
यावर आज राज ठाकरे यांचे वैयक्तिक काही नुकसान झाले नाही. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मत कमी झाल्याचे सांगत नानांनी राज ठाकरेंना टोला लगावला. नाना पाटेकर यांच्या या भूमिकेवर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.