औरंगाबाद: शेतकरी प्रश्नावर शिवसेनेची भूमिका बांडगुळासारखी आहे. शिवसेनेचा लढा म्हणजे दिखाऊपणा असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. ते सोमवारी औरंगाबादमध्ये बोलत होते. सरकारला विरोध करायचा आणि अधिवेशन काळात गप्प बसायचं अशी सेनेची भूमिका आहे. शिवसेनेची ही भूमिका बांडगुळासारखी आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीकडून सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात मुंडे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली.
सरकारचे निर्णय शेतकरीविरोधी आहेत. सरसकट कर्जमाफीची सरकारने घोषणा केली. मात्र ,अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या प्रश्नावर शिवसेना भाजपला विरोध करत असल्याचे भासवते. मात्र, सभागृहात ते शांत बसतात. शिवसेनेच दोन्ही बाजूंनी ढोल वाजवणं जनतेला कळत असल्याचं मुंडे म्हणाले. मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. कपाशीच्या पिकावर बोंड अळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं तात्काळ पाहणी करून हेक्टरी २५ हजार रुपयांचं आंदोलन द्यायला, हवं अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. अधिवेशन जवळ आलं आहे. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही, तर सभागृह बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.