दिल्ली: सरकारी वीज निर्मिती प्रकल्पांमधील निर्मिती कमी करुन ४ खासगी कंपन्यांचे खिसे का भरले?, असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. जनतेच्या पैशांची मोदींनी लूट का केली?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दररोज पंतप्रधान मोदींना गुजरातमधील परिस्थितीबद्दल प्रश्न विचारत आहेत.
‘२००२-१६ या काळात ६२ हजार ५४९ कोटी रुपयांची वीज खरेदी करुन ४ खासगी कंपन्यांचे खिसे का भरण्यात आले? सरकारकडून केली जाणारी वीज निर्मिती क्षमता ६२ टक्क्यांनी कमी करुन ३ रुपये प्रति युनिट दराने मिळणारी वीज खासगी कंपन्यांकडून २४ रुपये दराने का खरेदी करण्यात आली?,’ असे प्रश्न राहुल गांधींनी ट्विटरवरुन विचारले आहेत. जनतेच्या कमाईची लूट का करण्यात आली? असा सवालदेखील राहुल गांधींनी या ट्विटमधून उपस्थित केला.
२२ वर्षांचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या, असे ट्विट करुन राहुल गांधींकडून दररोज मोदींना प्रश्न विचारले जात आहेत. काल (गुरुवारी) त्यांनी मोदींच्या जाहिरातीबाजीमुळे गुजरातवर कर्जाचा डोंगर असल्याची टीका केली होती. मोदींच्या जाहिरातबाजीचा आर्थिक भार जनतेने का वाहायचा, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. ‘१९९५ मध्ये गुजरातवर ९ हजार १८३ कोटी रुपयांचे कर्ज होते. २०१७ मध्ये कर्जाचा हा आकडा २ लाख ४१ हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच गुजरातमधील प्रत्येक व्यक्तीवर ३७ हजार रुपयांचे कर्ज आहे,’ अशी आकडेवारी राहुल यांनी ट्विटमध्ये दिली होती. ‘तुमच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाची आणि जाहिरातबाजीची शिक्षा जनतेने का भोगायची?’, असा सवाल राहुल गांधींनी मोदींना विचारला होता.
राहुल गांधी २९ नोव्हेंबरपासून दररोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. राहुल यांनी मोदींना सर्वप्रथम घरांच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला होता. ‘२०१२ मध्ये ५० लाख घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ५ वर्षांमध्ये ४.७२ घरांची उभारणी करण्यात आली. मग घरांचे आश्वासन पूर्ण करायला ४५ वर्षे लागणार का?,’ असा सवाल राहुल गांधींनी केला होता. मोदींनी ५ वर्षांमध्ये ५० लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ५ वर्षांमध्ये ५ लाख घरेदेखील बांधली गेली नसल्याने आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आणखी ४५ वर्षे लागणार का?, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला होता.