महत्वाचे…
१.मनसेने मुख्यमंत्र्यांना टोला लगावल्याने दिले उत्तर २. मनसे विरुध्द काँग्रेस,भाजपा सामन्यात रिपाईची एंन्ट्री ३.मनसे आठवलेंना काय उत्तर देतात याकडे लक्ष.
मुंबई: मनसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भय्याभूषण पुरस्कार देणार असेल, तर मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्यायला हवा, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावला आहे. उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावरुन मनसेने मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणात आता आठवलेंनी उडी घेतली आहे.
‘उत्तर भारतीय लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला,’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावरुन मनसेने मुख्यमंत्र्यांवर कठोर शब्दांत टीका केली होती. ‘मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळू शकत नाही. पण भय्याभूषण पुरस्कार मिळावा,’ असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला होता. याच पार्श्वभूमीवर आठवलेंनी खोचक शब्दात भाष्य करत मनसेवर निशाणा साधला आहे. मनसेला हॉकर्स भूषण पुरस्कार द्यावा, असे आठवलेंनी म्हटले आहे.
‘मुंबईला वाढवण्यात मराठी माणसाचा वाटा आहेच. मात्र परप्रांतातून आलेल्या लोकांचेही मुंबई वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे,’ असे आठवलेंनी म्हटले. राज ठाकरेंनी थोडे सामंजस्याने घ्यावे, असा सल्लादेखील त्यांनी दिला. यावेळी आठवलेंनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. ‘राहुल गांधी सध्या मंदिरात जातात. त्यामध्ये काहीच चुकीच नाही. मात्र यामुळे त्यांना आता भाजप जातीयवादी असल्याची टीका करण्याचा अधिकार राहिलेला नाही,’ असे ते म्हणाले.