मुंबई : चार वर्ष झाले तरी नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध का लागत नाही? असा सवाल उच्चन्यायालयाने दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान केला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. सीबीआय आणि एसआयटीचा तपास अहवाल उच्चन्यायालयात सादर करण्यात आला आहे. दाभोळकर-पानसरे प्रकरणी तपासयंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घेऊन ठोस कारवाई करण्याचे निर्देश उच्चन्यायालयाने दिले आहेत.
खुलेआम धमक्या देऊनही नंतर लोकं छातीठोकपणे मुलाखती देत फिरतात, मग एखाद्याचा जीव गेल्यावर ही सर्व यंत्रणा काय कामाची? असा सवालही उच्चन्यालयाने विचारला आहे. कलाकार, विचारवंतांना पोलीस सुरक्षा पुरवणं हा या समस्येवरील उपाय होऊ शकत नाही असंही उच्चन्यालयाने म्हटलं आहे. तसंच पद्मावती सिनेमाबद्दलही उच्चन्यायलयाने आपलं मत मांडलंय. या देशात एक सिनेमा प्रदर्शित होऊ शकत नाही? असा सवाल उच्चन्यायलयाने विचारला. तसंच हल्ली निरपराध लोकांचे बळी घेणं खूप सोप्प झालंय, एखादा मोठा ट्रक गर्दीवर चालवला की झालं अशी खंतही उच्चन्यालयाने व्यक्त केली.