मुंबई – शिक्षकांची शेकडो पदे राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त असताना ती भरण्याची कार्यवाही केली जात नाही. सुरू आहेत त्या शाळा बंद करून शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात आहे. दुसरीकडे मात्र प्रत्येकवर्षी शिक्षकांच्या पात्रतेसासाठी शिक्षक पात्रता परीक्षा घेतल्या जात आहेत. यामुळे राज्यातील तरुणांमध्ये निर्माण झालेला आक्रोश आपल्याला दिसत नाही का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
सरकारकडून राज्यातील शाळा आणि शिक्षकांच्या विरोधात राबविण्यात येणाऱ्या धोरणाविरोधात रान पेटले असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांचे ट्विट आले आहे. यामुळे आता तरी मुख्यमंत्री या प्रकरणात दखल घेतील काय, असा सवाल शिक्षक पात्रता परीक्षेला सामोरे गेलेल्या उमेदवारांकडून केला जात आहे.
सुळे यांनी मुख्यमंत्र्याना केलेल्या आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे, की ‘शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी घेता पण पदे भरत नाही. शिक्षक जादा झाल्याचे कारण सरकार देतेय. एकीकडे शाळा बंद करण्याचा घाट, तर दुसरीकडे आवश्यक असणारी पदे भरण्याची मानसिकता नाही. या तरुणांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागतेय. त्यांचा आक्रोश @CMOMaharashtra तुम्हाला ऐकू येत नाही का?,असा प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे.