मुंबई – मुंबई व परिसरात आगीच्या घटनेत निष्पापांचे बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग आली. त्यामुळे आता महापालिकेचे अग्निशमन अधिकारी तळघरातील अग्निसुरक्षा तपासणार आहेत. अग्निसुरक्षा कायद्याचा आधार घेत आग लागण्याच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या ठिकाणांना अग्निशमन अधिकारी टाळे ठोकतील, असे आयुक्त अजॉय मेहता यांनी सांगितले.
कमला मिलमधील दुर्घटनेनंतर नागपाड्यातील इमारतीच्या तळघरात लागलेली आग, सिनेव्हिस्टा स्टुडिओतील दुर्घटना यामुळे महापालिकेने आता अग्निसुरक्षेच्या दृष्टीने शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करण्याचे ठरवले आहे. अग्निसुरक्षा कायद्यातील कलम ८ (१) नुसार आग लागण्याची प्रबळ शक्यता वाटल्यास त्या ठिकाणाला अग्निशमन अधिकारी टाळे लावू शकतात. या कलमाचा आधार घेत महापालिका तळघर तसेच इतर ठिकाणांची पाहणी करणार असल्याचे आयुक्त अजॉय मेहता यांनी सांगितले.
त्यामुळे तपासणी, नोटीस, अहवाल यामध्ये वेळ न जाता तातडीने कार्यवाही होईल. त्याचप्रमाणे उपाहारगृहांना १५ दिवसांची मुदत दिली असून त्यात बेकायदेशीर बांधकाम न पाडल्यास तसेच अग्निसुरक्षेच्या उपाययोजना न केल्यास त्यांच्यावरही पुन्हा कारवाई केली जाईल, असेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कमला मिल दुर्घटनेबाबत आयुक्त अहवाल तयार करीत असून, त्या संदर्भात संबंधितांकडून माहिती गोळा केली जात आहे. हा अहवाल पुढील आठवाड्यात मुख्यमंत्र्यांना दिला जाईल.