त्रिपुरा: त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या डाव्या पक्षाच्या सरकारला पायउतार करण्यासाठी कंबर कसून उतरलेल्या भाजपाने आक्रमक प्रचारास सुरूवात केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी थेट माकपला आव्हान दिले आहे. येथील मतदारांना मतदानापासून रोखले जाते. मी संपूर्ण माकपला सांगू इच्छितो की यावेळी त्यांची लढत भाजपाबरोबर असून स्वत:ला सांभाळा. भाजपा हिंसाचाराला बिल्कूल घाबरत नाही, असा इशाराच त्यांनी दिला. त्रिपुरा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
आम्हाला त्रिपुरातील हिंसाचाराचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण करायचे आहे. इथे स्टॅलिन आणि लेनिनची जयंती साजरी केली जाते. पण रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी विवेकानंदांची नाही. तुम्ही भाजपाला एकदा संधी देऊन पाहा. पाच वर्षांत आम्ही त्रिपुराला मॉडेल राज्य बनवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्यातील डाव्या पक्षाच्या माणिक सरकारवर टीकास्त्र डागले.
आम्हाला येथील परिस्थिती बदलायची आहे. इथे लाल बंधूंचे सरकार आहे. कम्युनिस्टांचे सरकार आहे. येथील सरकारी नोकरदारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला. गेल्या अनेक वर्षांपासून येथील सरकारी नोकरदारांच्या वेतनात वाढ झालेली नाही. तोच मुद्दा भाजपा या निवडणुकीत वापरताना दिसत आहे.
गेल्या आठवड्यात त्रिपुराच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सत्ताधारी पक्षावर टीका केली होती. त्रिपुरातील नागरिकांनी ‘माणिक’ ऐवजी ‘हिरा’ स्वीकारावा असे आवाहन केले होते.